भक्ति साधना (आरती साधना)
सिद्धता – वंदनीय दादांनी कार्यारंभी श्रीपंत महाराजांच्या आशीर्वादाने भक्तिसाधना सिद्ध केली. श्री पंतमहाराज कृत ९६ पदे, श्री साई समाधि मंदिर शिर्डी येथे विविध प्रहरी गायली जाणारी २२ पदे , ज्येष्ठ दिवंगत गुरुबंधू श्री मोहन कसबेकर लिखित २० पदे व इतर ८ पारंपारिक मिळून एकूण १४५ पदांचा या साधनेत समावेश आहे. दादांनी सुमारे ३५ वर्षे भक्तांना सन्निध ठेवून नित्याने या पदांचे स्तवन केले. फक्त झांजेच्या ठेक्यावर ही पदे गायली जात असत. पुढे अर्थातच 'दादां'च्या निर्वाणानंतर म्हणजेच १९९१ नंतरच्या त्यांच्या भक्तांनी लिहिलेल्या कुठल्याही पदांचा यात समावेश नाही.
श्रीपंत महाराज भावातीत अवस्थेत पदे म्हणत असताना त्यांच्याबरोबर असलेल्या भक्तांना नाद्ब्रह्म व शब्दब्रह्माची अनुभूती येत असे. या सर्व पदांना दादांनी विविध चालींमध्येे स्वरबध्द केले व श्री पंतमहाराजांकडून मान्यता प्राप्त करून घेतली. “दादा” स्वत : पदे म्हणत असताना वरील अनुभूतीचाच प्रत्यय येत असे. ही सर्व पदे स्वर, ताल, लयीत म्हटली पाहिजेत असा दादांचा कटाक्ष असे.
अभ्यासाअंती मला असे आढळून आले की, पदांच्या चाली एका प्रमाणित आणि स्वर, ताल, लयीने युक्त अशा पद्धतीत स्थित्यंतरित केल्याशिवाय सामान्य साधकाला त्या अनुभूतीचा प्रत्यय येणे शक्यच नाही. “दादां” कडे मी असा विचार व्यक्त केल्यानंतर त्यांनी तात्काळ आशिर्वाद देऊन अशा पद्धतीने प्रयत्न करण्यास अनुमती दिली. ही घटना घडली १९८२ मध्ये. तद्नंतर पुढील काळात पदांच्या चाली प्रमाणित अशा स्वर- ताल- लयीत बध्द करण्यासाठी अनेक प्रयोग करावे लागले. व २००८ मध्ये माझ्या स्वत:च्या आवाजात अशा पद्धतीने मी सर्व पदे ध्वनिमुद्रित केली. परंतु मला हवा असलेला गानकौशल्याचा अपेक्षित दर्जा अनुभवास येईना. म्हणून पुढील ५ वर्षे अनेक नामवंत गायकांशी संपर्क साधून वरील उद्धिष्ट साध्य करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. तरीही समाधानकारक प्रगती होत नव्ह्ती. शेवटी श्री संजीव चिम्मलगी या तरुण पिढीच्या प्रसिद्ध गायकाने हे आव्हान पेलले व 'दादांनी' दिलेला आशिर्वाद ३१ वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर फळाला आला. अशा रीतीने प.पू.बाबांनी श्रद्धा व सबुरी या दिलेल्या उपदेशाचा प्रत्यय आला.
भक्तिसाधनेच्या "भक्तिप्रेम लहरी” असे शीर्षक असलेल्या १४५ पदांच्या भक्तिसाधनेच्या ५ ऑडीओ सीडीजचे प्रकाशन ६ ऑक्टोबर, २०१३ श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांच्या श्री दत्तसंस्थानातर्फे पुरस्कृत केलेल्या कार्यक्रमात यशस्वीरित्या पार पडले. वरील संचाच्या निर्मितीची खालील ठळक वैशिष्टये
१) स्वरसिद्धता – शास्त्रीय संगीताचे लौकिक शिक्षण घेतले नसून सुध्दा विविध अशा सुमारे ३७ रागदारींमध्ये “दादांनी” पदांची केलेली स्वरबद्धता.
२) श्री संजीव चिम्मलगी या नवीन पिढीच्या मान्यवर गायकाने ह्रदयाचा ठाव घेणार्या आवाजात सहजतेने परंतु परिश्रमपूर्वक व अभ्यासपूर्ण केलेले सादरीकरण.
३) निर्मिती वैशिष्ट्ये – प्रचंड मोठे म्हणजे १४५ पदांचे एकूण १२ तासांचे ध्वनीमुद्रण असलेले अत्यंत आव्हानात्मक काम. एकच – निर्माता, गायक, वाद्यमेळ आणि रेकॉर्डिंग स्टुडीओमध्ये केवळ ८ महिन्यात पूर्ण केलेले विक्रम म्हणून नोंद व्हावी इतकी दर्जेदार निर्मिती. अशा निर्मितीला रु.१२ ते १५ लाख खर्च करावा लागतो.
४) १७ ऑगस्ट २०१६ रोजी ट्रस्ट तर्फे “भक्तीप्रेम लहरी” मधील १९ पदांचे सादरीकरण पु.ल देशपांडे मिनी थिएटर, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते. गायक श्री संजीव चिम्मलगी व इतर वाद्यवृंद यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून दाद दिली. या कार्यक्रमाचे व्हिडीओ व ऑडीओ शूटींग करण्यात आले असून ते आपण युट्यूब वर बघू शकता.
५) भक्तिसाधनेचे वेगळेपण – श्रोत्यांना अंतर्मुख करणारे, वारंवार ऐकावेसे व गुणगुणत राहावे असे सादरीकरण. वाद्यांचा कमीत कमी वापर व त्यामुळे पदातील तत्वबोधाची थेटपणे होणारी उकल, पदातील शांतरस, ताणतणाव दूर करणारा असा अनेकांचा अनुभव. एकाच गायकाने गायल्यामुळे गायन शैलीत सातत्य. भक्तिगायनाचा वस्तुपाठ, अंत:करण शुद्धीसाठी उपयुक्त, समूहगानाला योग्य. सर्व वयोगटातील श्रोत्यांना भावणारे.
भक्तिसाधनेमध्ये केवळ श्रवणभक्ति अपेक्षित नसून साधकाने सर्व पदे स्वर, ताल, लयीत, स्वत:च्या आवाजात म्हणण्याचा अथवा आवाजाची योग्य साथ नसेल तरी किमान गुणगुणण्याचा नित्याने प्रयत्न करावा. तरच त्या पदातून प्रवाहित होणारा तत्वबोध हृदयाचा ठाव घेईल व अंत:करण शुद्धीसाठी उपयुक्त होईल. भक्तिसाधना ही एक साधकाचा आत्मिक विकास घडवणारी व स्वत:चे कर्मविमोचन स्वत:च करण्यासाठी वं. 'दादांनी' श्री पंत महाराजांच्या आशिर्वादाने सिद्ध केलेले एक अत्यंत प्रभावी साधन आहे.
काही निवडक पदांची दृकश्राव्य माध्यमातील झलक याच विभागात पुढे दिली आहे.
सर्व श्रोत्यांनी व साधकांनी या भक्तिसाधनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी सदगुरू चरणी प्रार्थना. |